आदिनाथ कोठारे-ऊर्मिला कानेटकर यांचा घटस्फोट; 15 वर्षांचा संसार संपला, संयुक्त पोस्टमध्ये मोठी घोषणा
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय जोडी आदिनाथ कोठारे आणि ऊर्मिला कानेटकर यांनी वैवाहिक आयुष्य वेगळ्या मार्गाने पुढे नेण्याचा निर्णय घेतला आहे. दोघांनीही सोशल मीडियावर संयुक्त निवेदन प्रसिद्ध करत परस्पर संमतीने विभक्त होत असल्याची अधिकृत घोषणा केली. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या घटस्फोटाच्या चर्चांना अखेर या पोस्टमुळे पूर्णविराम मिळाला.
संयुक्त निवेदनात आदिनाथ आणि ऊर्मिला यांनी पती-पत्नी म्हणून त्यांचा प्रवास संपत असला तरी मुलगी जिजाच्या संगोपनासाठी ते कायम एकत्र राहतील, असे स्पष्ट केले आहे. “जिजा आमचं सर्वस्व आहे. तिच्या आनंदासाठी, सुरक्षिततेसाठी आणि उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही सहपालक (Co-parenting) म्हणून जबाबदारीने एकत्र काम करत राहू,” असे त्यांनी म्हटले आहे.
दोघांनी एकमेकांविषयी आदर कायम असल्याचेही नमूद केले. तसेच गेल्या अनेक वर्षांत चाहत्यांनी आणि माध्यमांनी दिलेल्या प्रेमाबद्दल आभार मानत, या वैयक्तिक निर्णयाचा आदर करण्याची विनंती केली आहे. या विषयावर हेच एकमेव अधिकृत वक्तव्य असेल आणि यापुढे कोणतीही प्रतिक्रिया देणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आदिनाथ कोठारे हे ज्येष्ठ अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांचे पुत्र आहेत. तर ऊर्मिला कानेटकर यांनी मराठी चित्रपट आणि मालिकांमधून स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाल्यानंतर दोघांनी 2011 मध्ये विवाह केला होता. 2017 मध्ये त्यांच्या आयुष्यात मुलगी जिजाचे आगमन झाले.
गेल्या काही काळापासून दोघांमध्ये दुरावा आल्याच्या चर्चा रंगत होत्या. मात्र त्यावर कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती. अखेर सोशल मीडियावरील संयुक्त निवेदनाद्वारे दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होत असल्याची माहिती चाहत्यांसोबत शेअर केली.
मराठी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय जोड्यांपैकी एक मानल्या जाणाऱ्या आदिनाथ आणि ऊर्मिला यांच्या या निर्णयामुळे चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. मात्र दोघांनीही वैयक्तिक आयुष्याबाबत गोपनीयतेचा आदर करण्याचे आवाहन केले आहे.