महाराष्ट्रात पुढील 5 दिवस पावसाचा अंदाज; या जिल्ह्यांना यलो अलर्ट
राज्यात पुढील पाच दिवस विविध भागांमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस, विजांचा कडकडाट आणि मध्यम ते जोरदार सरी पडण्याचा अंदाज असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील अनेक जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
१८ जुलैसाठी कोणत्या जिल्ह्यांना यलो अलर्ट?
१८ जुलै रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, अहिल्यानगर, बीड, पुणे, सातारा, सोलापूर, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना आणि विजांसह पावसाची शक्यता लक्षात घेऊन यलो अलर्ट लागू करण्यात आला आहे.
१९ जुलैलाही काही जिल्ह्यांमध्ये सतर्कतेचा इशारा
१९ जुलै रोजी अहिल्यानगर, पुणे, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट कायम राहणार आहे. विजांचा कडकडाट सुरू असताना उघड्या जागेत जाणे टाळावे, झाडाखाली थांबू नये आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असा सल्ला प्रशासनाकडून देण्यात आला आहे.
नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना
हवामानातील बदल लक्षात घेऊन स्थानिक प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचना पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विशेषतः विजांच्या कडकडाटाच्या वेळी अनावश्यक प्रवास टाळावा आणि सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे.
शेतकऱ्यांसाठी दिलासा
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर कमी झाला आहे. यापूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर आता पावसाने काहीशी विश्रांती घेतल्याने शेतकरी शेतीतील विविध कामे पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. सध्या पुढील पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता नसल्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.